Sunday, October 26, 2014

अल्ताफ अजीत शेख

नाव – अल्ताफ अजीत शेख
वय – ९ वर्षे
शिक्षण – २ री
संपर्क तारीख – १७.२.२०१४
पत्ता – भागलपूर, वृंदा मंदीर, युपी
       युपीला राहणारा अल्ताफ आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. सुरूवातीला वडील कमवत असत परंतु त्यांच्या डोळ्याला मार लागून तो निकामी झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. अचानक आलेल्या या दुर्दैवी फेऱ्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले होते. घरातील कर्ते अधू झाल्याने घरातील प्रत्येकालाच अधू झाल्यासारखे वाटत होते. कारण कमावणारी ती एकच व्यक्ती होती आणि खाणारी ४ तोंड होती. त्यामुळे आता पुढे आयुष्याची गुजराण कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सहज ज्याच्यातून पैसा मिळेल असे काम म्हणजे भीक मागणे, असे काम जे लहान मोठी सगळेच माणसे करू शकतात. त्यामुळे त्यांनी भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यास सुरूवात केली. हळूहळू कुटुंबातील सर्वच जण भीक मागून राहू लागले.
       अल्ताफची आई हिंदू आहे. परंतु दुसरे वडील मुस्लीम असल्याने त्यांनी मुस्लिम पद्धतीने मुलांना वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. अल्ताफचे आधीचे आकाश नाव बदलून त्यांनी अल्ताफ ठेवले. शिवाय मुस्लिम शिक्षण देण्यासाठी त्याला मदरसामध्ये पाठवण्यात येऊ लागले. अल्ताफला मदरशामधील शिक्षण आवडत नव्हते. नाईलाजाने तो मदरशात जात होता. आपल्यासोबत अशा घटना का घडत आहेत हे त्यालाही नीटसे कळत नव्हते. आपण आपल्या मनाविरूद्ध भीक मागत आहोत, न पटणारे शिक्षण घेत आहोत बस्स! एवढेच त्याला कळत होते. इथून पुढे आपण मदरशात जायचे नाही हा विचार त्याने मनाशी पक्का केला. त्यामुळे एक दिवस संधी पाहून अल्ताफ मदरशातून पळाला. तेथे त्याच्या आईवडिलांनीही त्याच्यासाठी शोधमोहिम सुरु केली होती. रेल्वेतून प्रवास करत तो सी.एस.टी स्थानकात येऊन पोहचला.
       आपण पळालो खरे, पण पुढे काय करायचे हे ९ वर्षाच्या अल्ताफला कळत नव्हते. सी.एस.टी स्थानकात इकडेतिकडे भटकण्यात तो वेळ घालवत होता. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून सी.एस.टी स्थानकात समतोल संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. रूचिता जाधव यांना तो भेटला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागत फिरत असताना रचिता ताईंनी त्याची चौकशी केली. सुरूवातीला त्याने घाबरून, “आई सोडून गेल्याने मी माझ्या आईला शोधायला आलो आहे.” असे सांगितले. पण तो खोटे बोलत आहे हे रुचिता ताईने ओळखले. तेव्हा ताईने त्याला मुंबई सारख्या शहरात स्टेशनवर, रस्त्यावर भटकणाऱ्या लहान मुलांवर कशापद्धतीने अत्याचार केले जातात हे सांगितले. समतोलच्या ठाणे येथील शेल्टरमध्ये तो सुरक्षित राहू शकतो याची जाणीव त्याला करून दिली. तेव्हा ताईबद्दल त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. परिणामी, अल्ताफ शेल्टरमध्ये येण्यास तयार झाला.
       ठाणे येथील शेल्टरमध्ये सुरुवातीला अल्ताफचे मन रमत नव्हते. त्याने तिथूनही २/३ वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पळून जाण्याचे त्याचे सर्वच प्रयत्न असफल ठरले. प्रत्येकवेळी समतोलच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला शेल्टरमध्ये परत आणले. शेल्टरमधील वातावरण त्याच्यासाठी कसे सुरक्षित आहे हे त्याला पटवून दिले. त्याच्यासारख्या इतर मुलांमध्ये अल्ताफ कसा मिसळेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. हळूहळू तो मुलांमध्ये मिसळू लागला. तेथील वातावरण त्याला आवडू लागले. नित्यनियमाने होणारी प्रार्थना त्याला आवडू लागली. त्या प्रार्थनाने त्याच्या मनास शांती मिळू लागली. त्याला पोलीस बनण्याची इच्छा आहे आणि इथे आल्यावर टिव्हीवरील कार्यक्रम पाहून पोलीस होण्याची इच्छा अधिक तीव्र झाली आहे असे तो सांगतो. अल्ताफला शिकण्याची देखील इच्छा आहे. काही दिवसांनी त्याने सांगितलेल्या पत्त्यावर त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. आपल्या हरवलेल्या मुलाला पाहून त्याचे आईवडील खूश झाले. अर्थात, अल्ताफच्या आईवडीलांना त्यांचा हरवलेला मुलगा पुन्हा भेटवून देणे हेच ‘समतोल’चे यश आहे.
       अल्ताफ सारख्या अनेक भरकटलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या आयुष्याचा आनंद मिळवून देणे यासाठी समतोल नेहमीच प्रयत्नात असते. पण या सदैव चालणाऱ्या कामाला आपल्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment