Sunday, October 26, 2014

अर्जुन नरेश गुप्ता

नाव – अर्जुन नरेश गुप्ता
वय - १३ वर्षे
धर्म - हिंदू
शिक्षण -
पत्ता - मानखुर्द रिमांड होम, कुर्ला
स्टेशनवरील कालावधी – ३ वर्षे
व्यसन - सिगारेट, व्हाटनर,
किती वेळा घर सोडले - २ ते ३ वेळा
संपर्क तारीख - ९.०५.१३
वेळ - ११.१३ मि.
परतीची तारीख - १६.०५.१४
संपर्क ते शिबीर माहीती -
       घरापासून दुरावलेल्या, दिशाहीन अवस्थेत रेल्वेस्टेशनवर भटकत असलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांचे घर मिळवून देणे, त्यांच्या भरकटलेल्या दिशांना योग्य वाट मिळवून देणे हेच समतोलचे मुख्य उद्दिष्ट आहे. ०९.०५.१४ रोजी अर्जुन सी.एस.टी स्थानकात प्लॅटफॉर्मवर भटकत असताना आढळला. समतोल कार्यकर्ती रुचिताताई यांच्या नजरेत हा मुलगा आला. थोडावेळ निरीक्षण केल्यावर हा मुलगा स्टेशनपरिसरातच राहत असावा अशी रुचिताताईची खात्री झाली. ताईने आपुलकीने त्यांची विचारपूस करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पण घरातून पळून आलेला अर्जुनने त्याच्यासाठी अनोखळी असणाऱ्या रूचिताताईकडून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मागील ३ वर्षापासूनचा प्लॅटफॉर्मवर राहण्याचा दांडगा अनुभव असलेला अर्जुन रुचिता ताईंना अगदी सहज बोलण्यात गुंतणारा नव्हता. पण रूचीता ताईंनीही त्याचा पाठलाग सोडला नाही. प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव अर्जुन सांगितले. या ताई आपल्याला प्रश्न का विचारत आहेत? त्यांच्यापासून आपल्याला हानी तर नाही ना ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळू लागले. त्याची ती अवस्था पाहून त्याला आपुलकीने जवळ घेत समतोल संस्थेविषयी समजावून सांगितले. तेव्हा थोड्याफार प्रमाणात का होईना, त्याला रुचिताताईंविषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तिथून त्याला ठाणा शेल्टरला आणणे सोपे झाले.
       शेल्टरमध्ये त्याची शारिरीक स्वच्छता करून त्याला खाऊ-पिऊ घालण्यात आले. आपल्यासारखीच इतर मुले पाहून त्याला थोडा धीर आला. नाईलाजाने का होईना पण आता काही दिवस तरी आपल्याला इथेच राहवे लागेल हे अर्जुनने ओळखले होते. त्यामुळे काही वेळाने तो स्वत:हून मुलांमध्ये मिसळला. मुलांमध्ये मिसळल्यावर त्याच्याशी संवाद साधणे आम्हांला सोपे झाले. कारण इतर मुलांपेक्षा अर्जुनचा प्लॅटफॉर्मवरचा प्रवास हा एक नाही दोन तर तब्बल ३ वर्षाचा होता. परिणामी, प्लॅटफॉर्मच त्याचे घर- आयुष्य होते. ते जीवन कितीही त्रासदायक असले तरी तो ते जगत होता, अनुभवत होता. त्याच्यासाठी ते स्वच्छंदी आयुष्य प्रिय होते. त्यामुळे त्याला त्या आयुष्यापासून परावृत्त करणे, त्याला योग्य दिशा दाखवणे हे आमचे जिकरीचे काम होते. काही दिवस त्याच्यासोबत घालवल्यावर लक्षात आले की तो शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याच्या नकळत त्याच्याकडून कौटुंबिक पार्श्वभूमी घेण्यास सुरुवात केली. थोडक्यात त्याचे समुपदेशन करण्यात आले. तेव्हा त्याच्या आयुष्यातील घटना उलघडू लागल्या.
       अर्जुन स्टेशनवर मौज म्हणून राहत नव्हता. त्याच्यावर दुर्दैवाने ती वेळ आली होती. कुटुंबात निर्माण झालेल्या परिस्थितीने त्याच्यावर ती वेळ आणली होती. आर्थिक ओढाताणीत त्याचे कुटुंब दैनंदिन गुजराण करत होते. राहते घरदेखील भाड्याचे होते. त्यात त्याची आई दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती. पण गर्भारपणातच तिचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे लहान वयातच अर्जुन आईच्या मायेला पोरका झाला होता. या घटनेला ३ वर्षे उलटून गेली.अर्जुनकडे वडीलांचे फारसे लक्ष नव्हते. काही दिवसांनी तेही घरातून निघून गेले ते कायमचेच. घरी परत आलेच नाहीत. घर भाड्याचे असल्यामुळे फार काळ तिथे थांबणे अर्जुनला शक्य नव्हते. त्यामुळे त्याला नाईलाजाने ते घर सोडावे लागले. रस्त्यावर राहण्यापेक्षा त्याने स्टेशनवर राहण्याचा विचार केला. निदान तिथे पावसापाण्याच्या वेळेस डोक्यावर छप्पर तरी असते. पोटाची भूक भागवण्यासाठी भंगार वेचण्याचे काम त्याने सुरु केले. त्यातून थोडेफार पैसे त्याला मिळत होते. स्टेशनवर ३ वर्षे गर्दुल्यांच्या सहवासामुळे त्यालाही नशा करण्याची सवय जडली. त्यामुळे वडापाव खाऊन पोटाची खळगी भरणे व उरलेल्या पैशाने नशा करणे हे अर्जुनचे दैनंदिन आयुष्य बनले. अर्थात, असे आयुष्य घडण्यात त्याची काहीही चूक नव्हती. निर्माण झालेल्या परिस्थितीने अर्जुनला घडवले. त्याचे कुटुंबच त्याच्याजवळ नव्हते. एवढ्या लहान वयात मुंबईसारख्या शहरात तो एकटा स्टेशनवर राहत होता. रात्री कधीतरी रिक्षात झोपणे व सकाळी भंगार वेचण्याचे काम करणे. हा त्याच्या जीवनाचा भाग होता. मानखूर्द, कुर्ला, सी.एस.टी स्थानकात भंगार गोळा करणे, भीक मागणे हे नित्याचे होते. एकदा मानकूर पोलिसांनी त्याची ही अवस्था पाहून त्याला बालगृहात दाखल केले होते. पण तिथूनही तो काही दिवसाने पळाला. स्टेशन परिसरात फिरत असताना समतोल कार्यकर्त्याना तो सापडला. आता समतोलच्या शेल्टरमध्ये चांगल्या लोकांच्या सहवासात आल्याने त्याच्या वाईट सवयींपासून तो परावृत्त होत आहे. अर्जुनमधील छुपे गुण आता बाहेर येत आहेत. तालबद्धरित्या नाचणे, चित्रकला यांसारख्या विषयात तो मग्न होऊन काम करतो. हळूहळू त्याला आपल्या कौशल्याची जाणीव होत आहे. अर्थात, समतोलच्या सहकार्याची त्याला साथ आहे.

No comments:

Post a Comment